ठाण्यातील तीन हात नाका चौकात आता दृष्टीहिनांसाठी ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.. वाहनांच्या वर्दळीमुळे दृष्टीहीनांना रस्ता ओलांडण्यासाठी इतरांवर अवलंबून राहायला लागते.या ठिकाणी एकूण सात रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून येते. या चौकाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले असता प्रायोगिक तत्वावर ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. तसेच ठाण्यातील इतर चौकांत वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा यंत्रणा बसवण्यात येणार आहे आणि त्यामुळे दृष्टीहीनांना ग्रीन सिग्नल मिळणार आहे ..

ठाण्यातील नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन ,कापूरबावडी व माजिवडा व तीन हात नाका या चौकांमध्ये एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या ठिकाणी फक्त अंध व्यक्तींनाच नाही तर डोळस व्यक्तीला ही रस्ता ओलांडताना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठीच ठाण्यामध्ये सुरू झालेल्या वाहतूक शाखेच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने ग्रीन सिग्नल यंत्रणा राबवण्याचा निर्णय ठाणे पालिका आणि वाहतूक शाखेच्या विद्यमाने घेण्यात आला आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यांवरील चौक असलेल्या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा म्हणून ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणे व दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींना सिग्नलवर रस्ता ओलांडणे सुरक्षित व्हावे, याबाबत ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी ही संकल्पना ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मांडली व या अनुषंगाने शहर वाहतूक विभागामार्फत सेवाभावी संस्थांमार्फत जागेचे अभ्यास व सर्वेक्षण करून दरपत्रके प्राप्त करण्यात आली आहेत.